गटनेतेपदी सौ. मीनल गावंडे यांची नियुक्ती चर्चेत
नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडे सक्षम व लोकप्रिय उमेदवार म्हणून ओळख असलेले प्राचार्य निलेश गावंडे यांना डावलून, पक्षांतर्गत राजकारणातून बोंद्रे कुटुंबालाच संधी देणाऱ्या खेळीविषयी संपूर्ण शहराला कल्पना असतांना,कॉग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी चिखलीतील सत्ताकेंद्र कुटुंबाभोवतीच राहावे, या हेतूने नगराध्यक्ष पदासाठी काशिनाथ बोंद्रे यांना उमेदवारी दिली. परिणामी अनेक वर्षे काँग्रेससाठी काम केलेल्या प्राचार्य गावंडे यांना वेळेवर राजकीय धक्का देण्यात आला.
या अपमानानंतर प्राचार्य निलेश गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. जरी नगराध्यक्ष पद भाजपाकडे गेले असले, व निवडणुकीत चिखली शहराने आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ‘विकासाला साथ’ या भूमिकेला पसंती दिली आणि भाजपाचे पंडित दादा देशमुख यांना नगराध्यक्षपदी संधी दिली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक एक मधून प्राचार्य गावंडे यांच्या पत्नी सौ. मीनल गावंडे या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. विशेष म्हणजे, ज्या काँग्रेसने निलेश गावंडे यांना नाकारले, त्याच काँग्रेसला आता सौ. मीनल गावंडे यांची गटनेतेपदी नियुक्ती करावी लागली आहे.
या नियुक्तीमुळे काँग्रेस पक्षात सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नगरसेवकांमध्ये इतर कोणताही प्रभावी चेहरा नसल्यानेच ही निवड करण्यात आली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, प्राचार्य निलेश गावंडे यांनी वेळेवर पक्ष बदलून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली मते मिळवली, हे त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास दर्शवते. आता सौ. मीनल गावंडे यांची गटनेतेपदी नियुक्ती ही काँग्रेसमधील कार्यकर्त्यांकडून अप्रत्यक्षपणे निलेश गावंडे यांच्या नेतृत्वाला मिळालेली मान्यता असून, राहुल बोंद्रे यांच्या राजकारणावर फुलस्टॉप असल्याचा संकेत मानला जात आहे.
तिकीट नाकारून बाजूला सारण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसलाच आज गावंडे कुटुंबाच्या नेतृत्वाचा स्वीकार करावा लागणे, हे पक्षासाठी सणसणीत राजकीय धक्का असल्याचे बोलले जात आहे.
या घडामोडींमुळे आगामी काळात प्राचार्य निलेश गावंडे हे चिखलीतील प्रमुख विरोधक म्हणून अधिक प्रभावीपणे समोर येतील, तर राहुल बोंद्रे यांचे राजकीय वजन कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भविष्यात काँग्रेसकडूनच निलेश गावंडे यांना विधानसभेसाठी पुढे केले जाईल का?, हा प्रश्नही आता चर्चेचा विषय ठरत आहे…



