चिखली नगरपरिषद निवडणूक आता तिरंगीतून आता चौरंगी लढत…
बहुजन समाज पार्टीकडून किशोर कदम उमेदवारीत,काँग्रेसच्या घराणेशाहीवर लोकांची तीव्र नाराजी…
चिखली – नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आतापर्यंत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांमध्ये तिरंगी लढत रंगेल, अशी राजकीय चर्चा होती. मात्र बहुजन समाज पार्टीकडून माजी नगराध्यक्ष पती किशोर कदम यांची उमेदवारी जाहीर झाल्याने ही लढत आता अधिकृतपणे चौरंगी होणार आहे.
बहुजन समाज पार्टीने “वंचित आणि शोषितांचा आवाज” म्हणून कदम यांना पुढे केले आहे. त्यांनी बहुजन चळवळीचे संस्थापक काशीराम आणि उ.प्र.च्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या कार्याचा उल्लेख करत बहुजन समाजाने स्वतःचा नेतृत्वकर्ता निवडण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यामुळे बहुजन समाजात या उमेदवारीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे काँग्रेसला मात्र यामुळे मोठा फटका बसत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांपासून काँग्रेसकडून उमेदवार निवडताना बोन्द्रे परिवारालाच प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये घराणेशाही रुजल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. शहरात कित्येक वर्षे सत्ता उपभोगूनही काँग्रेसने चिखलीमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता, बाजारपेठ विकास यांसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यात अपयश आल्याचा आरोपही जनतेत व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर बहुजन समाज, मुस्लिम समाज आणि अन्य घटकांमध्ये काँग्रेसविरोधात नाराजी वाढली आहे. प्रत्येक समाजात आता “आपला नेता, आपला प्रतिनिधी” असा भाव निर्माण झाला असून त्या दिशेने स्वतंत्र चेहरे समोर येऊ लागले आहेत.
भाजपकडून पंडितराव देशमुख, राष्ट्रवादीकडून निलेश गावंडे, काँग्रेसकडून बोन्द्रे परिवारातील काशिनाथ बोन्द्रे आणि आता बहुजन समाज पार्टीकडून किशोर कदम असे चार उमेदवार मैदानात आल्याने चिखलीची निवडणूक अत्यंत रंगतदार बनली आहे….चौरंगी लढतीमुळे मतदानाचे समीकरण मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत…



