गरिबांसाठी भाऊ,शेठसाठी सेठ.. पंडितदादा लोकांच्या हृदयात ‘थेट’…
सर्व समाजघटकांत ठसा उमटवलेलं नेतृत्व…
चिखली नगरपालिका निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले असून नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षातर्फे पंडित दादा देशमुख यांचे नाव अग्रस्थानी चर्चेत आहे. त्यांच्या जनसंपर्काच्या व्यापक जाळ्यामुळे आणि सर्वसमावेशक कार्यशैलीमुळे समाजातील प्रत्येक स्तरातून त्यांना तिकीट द्यावे, अशी प्रबळ मागणी होताना दिसत आहे.
सुमारे 40 वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या पंडित दादा देशमुख यांचे हसतमुख व्यक्तिमत्त्व, कोणालाही आपलेसे करणारा स्वभाव आणि प्रत्येकाची मनापासून विचारपूस करणारी त्यांची शैली यामुळे ते “आपला माणूस” म्हणून शहरभर प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या या आपुलकीमुळे त्यांनी चिखली शहर व परिसरात हजारो लोकांशी घट्ट नाळ जुळवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या सोबत जोडलेल्या लोकांमध्ये प्रचंड विविधता दिसते. सामान्य कुटुंबातील रोजंदारी मजूर, शिक्षण घेत असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी, संघ परिवारातील प्रमुख कार्यकर्ते, चहा विकणारे छोटे व्यवसायिक, ते कार विक्री करणारे मोठे उद्योजक—अशा प्रत्येक स्तरातील लोकांशी त्यांचे स्नेहसंबंध दिसून येतात.
गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि सर्व समाजघटकांत पंडित दादा देशमुख यांनी निर्माण केलेला विश्वास आणि प्रत्यक्ष संपर्क ही त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जात आहे. त्यामुळेच चिखली शहरातील राजकीय वर्तुळात त्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी तिकीट मिळण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार झाल्याची चर्चा आहे..



