चिखली शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगत बनवण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्य..चिखली विकासाचा नवा मार्ग : डॉ. संध्या कोठारी
चिखली शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रगत बनवण्यासाठी स्वच्छतेच्या कामांमध्ये मोठा बदल घडवून आणण्याचा निर्धार डॉ. संध्या कोठारी यांनी व्यक्त केला आहे. शहर स्वच्छ ठेवणे हे फक्त नगरपरिषदेचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असे सांगत त्यांनी कचरा व्यवस्थापनाच्या नव्या पद्धती राबवण्यासाठी स्वतंत्र योजना आखणार असल्याचे सांगितले. आगामी काळात शहरभर स्वच्छता मोहिमा, जनजागृती उपक्रम आणि कचरा संकलनाची सुधारित व्यवस्था लागू केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्वच्छतेबरोबरच शहराच्या एकूण विकासासाठी सर्वपक्षीय सहकार्य आवश्यक असल्यावरही डॉ. कोठारी यांनी जोर दिला. “विकासाची कामे कोणत्या पक्षाची किंवा कोणत्या गटाची नसतात. ती शहराची असतात. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून चिखलीचा विकास हीच खऱ्या अर्थाने आपली प्राथमिकता असली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. शहरातील संस्था, सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षांनी आपापसातील मतभेद विसरून एकत्रितपणे काम केल्यास चिखलीचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. कोठारी यांच्या पुढाकारामुळे स्वच्छता आणि विकास या दोन महत्त्वाच्या विषयांवर एकत्रितपणे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांची भागीदारी, प्रशासनाचे सहकार्य आणि सर्वपक्षीय पाठबळ मिळाल्यास चिखली शहराला नवे रूप मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला….



