महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक लोकशाहीसाठी घातक – जयश्री शेळके
- महाराष्ट्र सरकारने नुकतेच मंजूर केलेले विशेष जनसुरक्षा विधेयक हे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर गदा आणणारे असून हा कायदा जनतेच्या सुरक्षेसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री सुनील शेळके यांनी केला.
त्या म्हणाल्या, “‘जनसुरक्षा’ या गोंडस नावाखाली महायुती सरकारचा भयावह चेहरा लपवला जात आहे. हा कायदा लोकशाहीची मुळे कमकुवत करणारा आहे. चुकीच्या धोरणांना लोकशाही मार्गाने विरोध करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. प्रत्यक्षात यात जनतेची सुरक्षा नाही, तर सत्ताधाऱ्यांचीच सुरक्षा साधण्याचा प्रयत्न आहे.”
जयश्री शेळके यांनी पुढे स्पष्ट केले की, हा कायदा लागू झाल्यास पत्रकार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सरकारविरोधात लोकशाही पद्धतीने आवाज उठवणारे नागरिक यांच्यावर अन्याय होऊ शकतो. “सरकारविरोधी मतप्रदर्शन गुन्हा ठरवण्याचा मार्ग या कायद्यातून मोकळा होतो. हा लोकशाहीच्या गळचेपीचा गंभीर प्रकार आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने याविरोधात आवाज उठवला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.



