“पळसखेड व धोडप मध्ये वरून कीर्तन आतून तमाशा”
श्री हरिचैतन्य महाराज पळसखेड सपकाळ यांच्या पावन अस्तित्वाने पुनीत झालेल्या पळसखेड आणी धोडप या गावामध्ये श्री हरिचैतन्य महाराज यांनी मागील 30 वर्षांपासून आपल्या पावन वाणीने या पंचक्रोशीमध्ये पवित्र विचार आणी श्रम व चांगल्या चारित्र्याचे महत्व सदोदित सांगितले आहे.
पण याच पळसखेड व धोडप गावामध्ये शेकडो माय माऊल्यांच्या शिरावरील हंडा मात्र स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली तरी खाली उतरायला तयार नाही.पळसखेड आणी धोडप ही गट ग्रामपंचायत असून येथील राजकारण्यांची वरून कीर्तन आणी आतून तमाशा ही वृत्ती काही बदलायला तयार नाही.पिण्याचे पाणी आणण्यासाठी या गावातील स्त्रियांना शेतातील विहिरीवर जावे लागत असले तरी या गावात दारू मात्र अगदी होम डिलिव्हरीने मिळते.
जुने खराब म्हणून नवीन निवडून दिले तर जुन्यांनी आपल्या सवयी नव्यांना लावून दिल्या.पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधाही न पुरवू शकणाऱ्या ग्रामपंचायतीला दोन्ही गावाच्या मध्ये विकली जाणारी आणी अगदी विस वर्षाच्या तरुणांना पण सहज उपलब्ध होणारी दारू देखील दिसत नसेल तर आपण कोणत्या लायकीचे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत याचा विचार येथील सुज्ञ जनतेने करणे आवश्यक आहे.
गावात पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी योजना नाही,गावातील बाया बापडे रस्त्यावर संडासाला जातात,गावात पाहुण्यांचे स्वागत घाणेरडे उकिरडे करतात,आणी गावात अगदी प्रेत जाळण्यासारख्या भावनिक बाबीबाबत सुद्धा भांडणे होतात.तरी या गावातील सतत दलबदलू राजकारणी मात्र भागवत सप्ते आणी एकादशी,चतुर्थीच्या आवरनाखाली स्वतःचे काळे मन स्वच्छ दाखवण्याच्या प्रयत्नात दिसतात.जिल्हा परिषद मध्ये अनेक वर्ष प्रतिनिधित्व असून देखील जर पाण्यासारखी मूलभूत सुविधा प्राप्त होत नसेल तर धार्मिकतेचा बुरखा पांघरूनदेखील तुमचे काळे मन झाकल्या जावू शकत नाही असा आरसा येथील लोकप्रतिनिधींना जनतेने दाखवून देणे आवश्यक आहे.



